मूड खल्लास
| मूड खल्लास | | |
गेल्या वरषी जालुऱ्याच्या जत्रला गेल्तो. तिथं टुरिंग टाकीजात शारूकचा शिनेमा पायीला- डान. म्हईनाभर डोक्शातून डान गेला नवता. म्हणलं, पुढचा सुपरस्टार आपणचं! मंग म्या तशी तैयारीबी सुरू केल्ती. वारकाला म्हणलं, डबल पैशे देतू, पर शारूकवानी कटिंग व्हाया पायजेन. कटिंग करून घराला आलू, आन् बा कानाखाली आवाज काढीत म्हणला, ‘काय येड-बीड लाग्लं व्हय रं तुला? ही काय सायराबानूवानी कटिंग गेली’ तुमास्नी सांगतू, सारा मूड खल्लास झाल्ता. पर म्हणलं, हिंमत हारून जमणार न्हाई. काईतरी येगळं करायचं म्हन्जी लोक बोलणारचं. तडक वावरात गेलू आनं शेळ्याम्होरं डानचे डायलाग म्हणाया सुरवात केली. आवो, डायलाग संपले तवा एकबी शेळी जाग्यावर न्हवती. म्हणलं, आपल्यावानी डान आपण्ांच. शेळ्याबी घाबरल्या.
तो ये आर रयमान ठाव हाय नव्ह? आवो, त्यो ‘रूकमनी, रूकमनी शादी के बाद क्या क्या हुवा’ गाण्यावाला. हां, बराबर. तेला आसकर मिळालं व्हतं, तवा काय पानभर फुटू आल्ता त्येचा पेपरात. चानलवाले त अशा उडय़ा हाणीत व्हते, जसा आसकर त्येनलाच भेटला. समदीकडं रयमानचं कवतीक झाल्तं. मंग माह्यावालंबी टाळकं फिरलं. म्हणलं, भारताला नेक्स्ट आसकर आपणचं आणायचं. लागोलाग माळ्यावर चढलो, आन् काय-काय वाद्य गावल्यात त्ये धुंडाळून काढले. टाळ, ईना, पेटी, ढोलकं समदे माळ्यावर येडेवाकडे पडेल हुते. त्यावर पाली, कोळी, झुरळं येन्चा रियाज चालू व्हता. ते समद खाली काढलं, तवा म्हाया आज्जीला लय आनंद झाल्ता. तिला वाटलं, नातू बंद पडेल भजनी मंडळ पुन्हांदी सुरू करतोय. मंग म्या तिला म्हणलो, ‘आज्जे, हे आसकरसाठी हाय.’ मग लागोलाग म्या ‘सरगम’ बॅण्ड पार्टीचे तीन-चार वसताद गाठले, आन् म्हायावाली आयडिया त्येनच्या टाळक्यात ओल्ती. म्हणलं, ‘गडय़ांनू, नावबी हुईल आन् चिक्कार पैकाबी भेटल.’ समदे तय्यार झाले. रोज सांच्याला गावच्या समाजमंदिरात रियाज करायचं ठरलं. एवढा पैका मिळणार म्हणल्यावर तेन्नीबी बॅण्ड पार्टीचं काम सोडलं. वसताद मंडळीला तर आधीपास्न्ांच रयमानची गाणी येत हुती, मंग तेचीच तालिम सुरू केली. आमाला लय हुरूप आल्ता. म्हणलं, आयची आन, ह्या येळी आसकरला फारम भरूनच टाकू. तवर लय तयारी हुन जाईन. पर एका दिशी माशी शिंकली, साऱ्या सपनाचा चुथडा झाला. पाटलाचा डाकटर पोरगा समाजमंदिरात आल्ता. त्यो म्हणाला, ‘गडय़ाहो, आसकर आस मिळत नस्तं. सवोताची गाणी लागत्यात आन् तीबी शिनेमात घ्याया पायजेन. मंग त्यो शिनेमा आसकरला जाया पायजेन. आन, त्या रयमानची वाद्ये पायलीय व्हयरं? आर, तूमी त कुठबी टिकणार न्हाई.’ झालं, सारा इसकोट झाला. वसताद मंडळी माला शिव्या घालून पुना बॅण्ड पार्टीत गेली. आन, म्हायावाली टाळ, ईना, पेटी पुनीन्दा माळ्यावर जाऊनशान बस्ली. थितं पाली, झुरळ आन् कोळ्यांचा रियाज पुन्यान्दी सुरू झाला.
अशी म्हाया सपनांची आन् पिल्यानची वाट लाग्ली. आटव्यांदा धाव्वी फेल झालो, तसा बा म्हणला, ‘बास! लई झाल शिकशान. आपल्याला गरामपंचायतीच्या योजनेत गाळा भेटतूय, तुला झकास किराणा दुकान टाकून देतू.’
आता म्या किराणा दुकानात बसत आस्तू. बर चाललय दुकान, लगन होऊनबी आता धा-बारा वरषे झालेत. एक पोरगं हाय. बरा चाल्लाय टुकीटुकीचा संसार. त्यादिशी पोरगं शाळातून डायरेक्ट दुकानात आलं, आन् लाडीगोडी लावत म्हणल, ‘पप्पा, माला शिनेमान हिरू व्हायचंय.’
खानकन तेच्या कानाम्हागं आवाज काढला आन् म्हणलो, ‘किशन्या, पोरा गपचूप शिक, ते आप्ल काम न्हाई. म्हयाबी डोकशात आशेच येडेवाकडे ईचार यायचे, शेवटी हातात हा तराजू आला लेका.’
0 comments:
Post a Comment